रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याला बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी ही विविध तालुक्यात पावसाची सर्वदूर हजेरी होती. चोवीस तासात तब्बल ४३१.७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदी, धरणातील पाणी पातळी वाढली आहे. आज गुरूवारपासून जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. अखेर वरूणराजाचे पुनरागमन झाले असून सलग चार दिवस पाऊस सुरूच आहे. त्यामुळे भात लावणीला वेग आलेला आहे. बुधवारी सकाळी पावसाचा जोर होता. त्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन आणि सायंकाळी, रात्री पावसाचा जोर वाढला. एक जून ते २२ जुलैपर्यंत सरासरी १ हजार ५६४ मिमी इतका तर ४६ टक्के पाऊस झाला आहे. तर गतवर्षी १ हजार ७१२ मिमी,, ५० टक्के पाऊस पडला होता. केवळ चार टक्के कमी पाऊस यंदा झाला आहे. नदी, धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.