रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेला 'ऑरेंज अलर्ट' लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवार दिनांक ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या जिल्ह्यात कोसळत असलेल्या सततच्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या संस्थांना असणार सुट्टी
अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खालील सर्व शैक्षणिक संस्थांना ६ जुलै रोजी सुट्टी असेल:
सर्व अंगणवाड्या
सरकारी व खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा
जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा
अनुदानित व विनाअनुदानित शाळा
सर्व आश्रमशाळा
सर्व महाविद्यालये
व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील सर्व शैक्षणिक संस्था
प्रशासनाचे आवाहन
पूरसदृश परिस्थिती आणि मुसळधार पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.