रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळ रविवारी पहाटे ४.४५ वाजता लोखंडी शिगा भरलेल्या भरधाव ट्रकने चार वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर तो पुलावरून सुमारे १५ फूट खोल विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रकचालक विशाल गोकुळ माने (रा. वाशी धाराशिव) जागीच ठार झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रक (एमएच ०६ बोडी २५५५) पालीहून रत्नागिरीकडे लोखंडी शिगा घेऊन जात होता. घटनास्थळी आल्यानंतर वेगावर नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला (एमएच ०७ एजे ९९१३) मागून जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर टेम्पो उलटून उभ्या असलेल्या दुसऱ्या टेम्पोला (एमएच ०५ ईएल ०२२७) बडकला. त्यानंतर ट्रकने समोरून येणाऱ्या कारलाही (एमएच ४६ सीआर ९१२३) धडक दिली. अपघातानंतर ट्रक थेट पुलावरून खाली जाऊन विहिरीत कोसळला. यामध्ये क्लिनर योगेश गौतम माळी (वय ३२, रा. धाराशिव) आणि मजूर राजू कुमार (१९, रा. उत्तर प्रदेश) हे जखमी झाले.
अन्य वाहनांतील प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली. या अपघातातील जखमींना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिका सेवेद्वारे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढताना काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी हातखंबा टॅब, रत्नागिरी ग्रामीण पोलीस, अग्निशमन दल, आरटीओ व प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
विहीर उपसून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू ट्रक विहिरीत कोसळल्यामुळे चालक अडकून पडला होता. लोखंडी साहित्यात अडकलेल्या चालकाचा फक्त पाय दिसत होता उर्वरित शरीर विहिरीत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.