देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी नदीवर प्राधिकरणाने गर्डर बसवण्याची तयारी दर्शवून, 13 ते 16 नोव्हेंबरपर्यंत वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे मार्गदर्शक फलक जागोजागी लावले होते. काम सुरु न झाल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्ग अवलंबून नाहक त्रास सहन करावा लागला.
मात्र, महामार्गावर काही कारणास्तव काम सुरु होणार नसल्याच्या सूचना न पसरवल्याने वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्गावरून अंतर्गत जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करताना खाच खळग्यातून करावा लागला. नाहक वेळ आणि अधिक इंधन भाराचा फटका सुद्धा सहन करावा लागला. त्यामुळे आधीच त्रस्त आणि संभ्रमात पडलेली जनसामान्य जनता आणि वाहन चालक आता आणखी त्रस्त झाले होते.
सोमवारी गर्डर बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. रात्री पासून पहाटेपर्यंत काम सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले. पण हे काम सुरू करताना कोणत्या परवानगीची आवश्यकता भासली होती काय? की तुम्हीच तुमच्या स्तरावर मनास वाटले म्हणून ही वेळ ठरवली? जर यापुर्वी सकाळी 10 ते दुपारी 1 नंतर दुपारी 3 ते सायंकाळी 5 व रात्री 10 ते 3 ही वेळ ठरवण्यात आली होती. त्यात बदल केला आहे तो कोणाच्या आदेशानुसार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित व जनतेला विचार करण्यासाठी भाग पडणारा असून जनसामान्यांच्या या प्रश्नावर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही मौन बाळगल्याने वाहन चालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रात्री 11 ते पहाटे 3 वाजे पर्यंत गर्डर बसवण्याचे काम केले जाणार असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आपल्याला मिळाले असल्याचे संगमेश्वर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
सोमवारी गर्डर बसवण्याच्या कामाच्या ठिकाणी सबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी हे प्रत्यक्षात उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्याकडून गर्डर चे काम करत असताना महामार्गावरील वाहन वाहतूक थांबवण्याची परवानगी लागते का? व तशी परवानगी लेखी स्वरूपात घेतली आहे का? असे विचारले असता त्यांच्या कडून संभ्रम निर्माण होतील अशी उत्तरे मिळाली. हा सर्व प्रकार अलबेल असा असून जनतेला वेठीस धरून ठेकेदाराला आशीर्वाद देण्याचा प्रकार आहे ? अशी चर्चा सुरु होती. या बाबत केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची काही लोक भेट घेऊन वस्तुस्थिती कथन करणार असल्याची माहिती देण्यात आली.