रत्नागिरी : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी व एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधनदरातही कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये तसेच पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
मध्यपूर्व, अमेरिका, युरोपियन खंड तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाईबाबत चुकीच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
इंधन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने Bharat Petroleum Corporation Limited (बीपीसीएल), Hindustan Petroleum Corporation Limited (एचपीसीएल) आणि Indian Oil Corporation Limited (आयओसीएल) या कंपन्यांच्या प्रतिनिधी व समन्वयकांशी संपर्क साधून साठा आणि वितरण व्यवस्थेची माहिती घेतली. संबंधित कंपन्यांनी जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून नियमित व सुरळीत पुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
सलग सुट्ट्या, पर्यटन हंगाम आणि होळी सणानिमित्त बाहेरगावी असलेले रत्नागिरीकर मूळ गावी परतल्याने काही पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप व गॅस एजन्सींकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सेवेस तत्पर असल्याचेही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.