चांदण्यासह वाऱ्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला 
रत्नागिरी

Ratnagiri News : चांदण्यासह वाऱ्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला

जवळपास महिनाभर मासेमार संकटात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः निसर्गाच्या कोपामुळे गेले महिनाभर जिल्ह्यातील मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाली आहे. प्रथम पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने ती मिळत नव्हती. आता समुद्रात वारा असल्याने मच्छीमार नौका समुद्रात जाण्यासही धजावत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार आर्थिक अडचणींमुळे मेटाकुटीला आला आहे. याचा परिणाम म्हणून रविवारी मासळीचे दर चढे असल्याने मच्छीमार्केटमध्ये खवय्यांची वानवा होती.

जानेवारीच्या 3 तारखेला पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या अगोदरचे आणि नंतरचे काही दिवस मासळी स्थलांतरीत होते. दरवर्षीचा हा अनुभव आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच मच्छीमार नौकांना मासळी खर्चाइतकीही मिळत नव्हती. पौर्णिमेचा मासे न मिळण्याचा परिणाम ओसरत असतानाच समुद्रात जोरदार वारे सुरु झाले. समुद्रात नौकांची मासे पकडण्याची जाळी वाऱ्यांमुळे गुरफटून तुटू लागली. आधीच मासे कमी प्रमाणात मिळत असताना नादुरुस्त होणाऱ्या जाळ्यांचा खर्च अंगावर पडू लागला. त्यामुळे अर्ध्यावर मासेमारी सोडून नौका पुन्हा बंदरात परतण्याचे प्रमाण वाढले.

नौकांचे इंधन, नौकेवरील खलाशी व इतर कामागारांचे रेशन, बर्फ असा विविध खर्च करूनही तो वसूल होण्याइतकीही मासळी मिळत नाही, अशी अवस्था आहे. जी काही मासळी मिळत आहे ती महाग दराने विकावी लागत आहे. हे दर परवडत नसल्याने प्रमुख मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांचा शुकशुकाट होता. पापलेटचे दर्शन तर दुर्लभच होते. मोठा सरंगा 650 ते 700 रु. किलो दराने बंदरावरून खरेदी करावी लागल्याचे मच्छीमार महिला भाटकर यांनी सांगितले. सुरमईचा दर 800 ते 900 रुपये, सौंदाळे 300 ते 350 दराने मिळत होते. बांगड्याचा किलोचा दर 200 रु. किलो होता. व्हाईट कोळंबी 500 ते 600 रु. किलो दराने विकली जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT