रत्नागिरी ः जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 226, तर 9 पंचायत समितींच्या एकूण 112 जागांसाठी 444 अर्ज दाखल झाले होते. यापैकी जि. प. साठी 49, तर पं.स. साठी 101 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात पळ काढला आहे. सर्वच पक्षांतील डावललेल्या इच्छुक व नाराजांनी ईर्ष्येने पेटून निवडणूक लढवायचीच असा चंग बांधला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली दिसून आली होती. तर काही ठिकाणी बंडोपंतांना शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धामधूम सुरू होती. विशेष म्हणजे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. अनेकांना शेवटच्या काही तासात एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. अनेक ठिकाणी डावललेल्या उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये बंडोखोरीचा पेव फुटला होता. अर्ज छाननी झाल्यानंतर मंगळवारपर्यंत(दि.27) अर्ज मागे घेण्याची मुदत होती. दुपारी 3 वाजता मुदत संपली. त्यानुसार जि.प. च्या 49 जणांनी तर पं. स. च्या 101 उमेदवारांनी निवडणूकीचे मैदान सोडल्याचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यात सर्वात बंडखोरीचा फटका हा चिपळूण, संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्याला बसला आहे.