देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने एका ३९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश गंगाराम शिवगण (वय ३९ वर्षे, रा. आंबेड बुद्रुक, शिगवणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश शिवगण हा घरी एकटाच राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी आंबेड बुद्रुक येथील शिगवणवाडी येथील ओढ्यातून घरी ये-जा करत असे. सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास, मुसळधार पावसामुळे या ओढ्याला मोठा पूर आला होता. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात गणेश वाहून गेला. आंबेड बुद्रुक ते सोनगिरी दरम्यान असलेल्या चिनामिना पुलाखालील मोरीतून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात त्याचा मृतदेह आढळून आला.
मानसकोंड गावचे पोलीस पाटील आणि आंबेड बुद्रुक गावचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे विकास गोविंद फेफडे यांनी या घटनेची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरीवरून संगमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. मनवल हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. मयताचा शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे आंबेड बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.