रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. रविवार आणि सोमवारी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. चोवीस तासात २५०.३९ मिमी, तर सरासरी २७.८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी कडक उन्ह व सायंकाळी पाऊस कोसळत आहे.
जिल्ह्यात मान्सून वेळेवर येऊनसुध्दा म्हणावा तसा पाऊस यंदाच्या वर्षी झालेला नाही. जून महिन्यात चार ते पाच दिवसच पाऊस झाला. जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत जून महिन्याचा बॅकलॉक भरून काढला. ऑगस्ट महिन्याने मात्र निराशा केली असून पावसाने पाठच फिरवली. सप्टेंबर महिन्यात संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात, नाचणी पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यावरील पाणी टंचाई दूर झाली असून नद्या, धरणातील पाणी पातळी वाढलेली आहे. जिल्ह्यात १ जून ते ७ सप्टेंबरपर्यंत सरासरी २ हजार ५५४ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार ३६२ मिमी पाऊस झाला होता. ८३० मिमी पाऊस यंदा कमी पडला आहे. सप्टेंबर महिन्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.