रत्नागिरी : सरकारच्या महत्त्वकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत चांगले, शुध्द पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेला चांगले यश आले आहे. ४ लाख ४८ हजार १६१ नळजोडण्यांचे जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३ लाख ८८ हजार ५२८ घरांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ८६ टक्के काम पूर्ण झाल आहे. जलजीवनच्या झालेल्या कामांमुळे हजारो कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नळजोडणीत गुहागर तालुक्याने बाजी मारली असून तब्बल ४० हजार ३०६ घरांमध्ये नळजोडणी पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी नळजोडणी लांजा तालुक्यात झाली आहे.
राज्य, केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलजीवन मिशनकडे पाहिले जाते. पहिल्या टप्प्यात सुरूवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामे झाली आणि कित्येकांच्या घरी पाणी आले. त्यानंतर मागील वर्षभरापासून निधीअभावी कामे रखडत गेली. त्यामुळे कामांना ब्रेकच लागला होता. अखेर जिल्ह्यात पावणे चार लाखांहून अधिक नळजोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ५९ हजार ६२३ नळजोडण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच जिल्हा १०० टक्के नळजोडणीचा टप्प्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. नळजोडणीचे काम पूर्ण झाल्यास खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
निधी मिळाल्यास आणखीन कामांना वेग
जलजीवन मिशनच्या कामांसाठी जिल्ह्याला ११ कोटी आले आहेत. प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर ठेकेदारांच्या खात्यात वर्ग केल्यास काम सुरू करण्यास वेग येईल. पुढील काही महिन्यात नळजोडणीचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे.