रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील ७ ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे आणि नागरी बेघर निवारा शाश्वत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेची कार्यवाही नगरपरिषदेच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून होणार आहे. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण आणि नागरी बेघर निवाऱ्याच्या शाश्वततेसाठी निधींची तरतूद करण्याचे विषय सभेसमोर आहेत.
शहरातील ७ ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्यांपैकी काही झोपड्या शासकीय जागांवर आहेत. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नगरपरिषदेतील शिवसेना-भाजप युतीने कार्यवाही सुरू केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनानंतर शासकीय जागा मोकळ्या होऊन त्याचा विकासकामांसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे या कामासाठी सर्वेक्षण करून त्याचा आराखडा बनवून शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यासाठी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या कामी येणाऱ्या खर्चालाही सर्वसाधारण सभेची मंजुरी दिली जाणार आहे. शहरातील शनिवार आठवडा बाजारजवळ रत्नागिरी नगरपरिषदेचा नागरी बेघर निवारा आहे. या बेघर निवाऱ्याचे गेल्यावर्षी एका स्वतंत्र संस्थेमार्फत निरीक्षण झाले. या संस्थेने हा निवारा उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला आहे. या अनुषंगाने काही सूचनाही करण्यात आल्या असून, त्यातील बेघर निवारा शाश्वत राहण्यासाठी देखभाल व व्यवस्थापन निधीची तरतूद करण्याचे सूचित करण्यात आले आहे.