चिपळूण : मागील तीन-चार दिवस कोसळणार्या पावसाने चिपळूणवासीयांच्या पोटात धडकी भरवली होती; मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिक व व्यापार्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गुरुवारी चिपळूण तालुकावासीयांनी श्रावणसरींचा अनुभव घेतला, तर बहुतांश पूर्ण दिवस चकचकीत सूर्यप्रकाश पाहायला मिळाला.
चिपळूण आणि पूर हे समीकरण झाले आहे. शहरातून वाहणारी शिव नदी आणि वाशिष्ठी या नद्यांमुळे चिपळुणात काही वर्षे पूर येत आहे; मात्र 2021 चा महापूर धडकी भरवणारा होता. मात्र, चार वर्षांनंतर मंगळवारी चिपळूण शहराला वाशिष्ठी व शिवनदीच्या पाण्याचा वेढा पडला. सुदैवाने बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले नाही. शिवाय प्रशासन वेळीच अलर्ट राहिल्याने मोठा धोका टळला. यावर्षी पावसाची सरासरी कमी झाली होती. आता सरासरी 80 टक्के पाऊस झाला आहे. चिपळूणमध्ये आत्तापर्यंत 3 हजार 454 मि.मी. म्हणजेच 97 टक्के पाऊस झाला आहे.
गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 94 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजे, पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मागील चार दिवसांत कोळकेवाडी, पूर्व विभाग दसपटी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने वाशिष्ठीला पूर आला; मात्र प्रशासनाने ही परिस्थिती युद्धपातळीवर हाताळल्याने नागरिकांना फारसा धक्का बसला नाही व नुकसान देखील झाले नाही. आज (गुरुवारी) दिवसभर चकचकीत सूर्यप्रकाश होता तर अधूनमधून ऊन-पावसाचा खेळही सुरू होता. त्यामुळे अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या चिपळूणवासीयांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवाला अवघे सात दिवस शिल्लक असताना नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडविली. अतिवृष्टीमुळे अनेक व्यापार्यांचा माल येणे बाकी आहे. तो आता ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून येऊ लागला आहे.
अतिवृष्टीमुळे चिपळूण-कराड मार्ग बंद होता. पाटण तालुक्यातील हेळवाक येथे कोयना नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कोयना धरणातून 95 हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत होते. परिणामी, हे पाणी नदीपात्राबाहेर येऊन हेळवाक या ठिकाणी रस्ता बंद झाला होता. या पार्श्वभूमीवर चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा मोठा फटका एस.टी. वाहतुकीला बसला. उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांची एस.टी. वाहतूक ठप्प होती. चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.