रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पालघर येथील संतोष शशिकांत भानुशाली (वय 50, रा. नाईक कॉम्प्लेक्स, ता. वाडा, जि. पालघर) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. योग राजेश भानुशाली (22, रा. विरार, मुंबई) याला वाचवण्यात यश आले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 29 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
भानुशाली कुटुंब पर्यटनासाठी रत्नागिरीत आले होते. सकाळी 9.30 वाजता ते आरे-वारे समुद्रकिनारी गेले. फिरून व फोटो काढून झाल्यानंतर कुटुंबातील संतोष, मानव, वरद आणि योग हे समुद्रात पोहण्यासाठी गेले असता मोठ्या लाटेमुळे ते अडचणीत आले. यापैकी मानव आणि वरद कसेबसे पाण्याबाहेर आले; मात्र संतोष व योग लाटेत गटांगळ्या खाऊ लागले. कुटुंबीयांच्या आरडाओरडीनंतर रेस्क्यू टीमने समुद्रात उड्या मारून दोघांना बाहेर काढले. योग शुद्धीवर होता; परंतु बेशुद्ध संतोष यांना सीपीआर दिल्यानंतर श्वास सुरू झाला आणि तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र सकाळी 10.45 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून सहायक पोलिस फौजदार पालांडे अधिक तपास करत आहेत.