रत्नागिरी : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. महागाईच्या काळात मानधन थकल्यामुळे त्यांना आर्थिकसह अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आता राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही मानधनाचा हिस्सा मिळाला असल्याने अखेर त्यांना तीन महिन्यांचे थकलेले मानधन मिळाले आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
अंगणवाडी सेविकांना सध्या 13 हजार रूपये तर मदतनीसांना 7 हजार 500 रूपये मानधन दिले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 772 अंगणवाडी सेविका असून 2 हजार 603 मदतनीस आहेत. यासर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. या मानधनात केंद्र आणि राज्य शासनाचा वाटा निश्चित करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होत आहे, परंतु केंद्राचा काही हिस्सा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. मात्र मार्चखेरीस केंद्र शासनाकडून थकलेला हिस्साही जमा करण्यात आला आहे.