रत्नागिरी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी विभाग, जि.प. कृषी विभागाकडून खते, बियाण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर खतांचा काळाबाजार, साठवणूक होवू नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील खत विक्रेत्यांच्या दुकानांवर अचानक धाडी टाकून तपासणी मोहीम सुरू झाली आहे. तब्ब्ल २८५ दुकानांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी गुहागर शृगारतळी व रत्नागिरी-जाकादेवी येथील दोन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
खरिपासाठी १२ हजार ५५० खतांचे आवंटण मंजूर झाले आहे. काही खतांचा साठाही ठेवण्यात आला आहे. दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बियाणे यांचा काळाबाजार, साठवणूक, चढ्यादराने विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात अचानक धाडी टाकून तपासणी मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये ९ तालुक्यातील १ कृषी अधिकारी, १८ कृषी अधिकारी, जिल्ह्यातील दोन अधिकारी ही सर्व टीम तपासणी करत आहे. कृषी दुकानांत खते, बियाणे दरफलक लावले आहे का, साठवणूक रेकॉर्ड, शेतकऱ्यांना बसण्याची, पाण्याची सोय आहे का नाही, पॉसमशीनवर नोंद होते का नाही, बियाणे चांगले आहे का, निकृष्ट दर्जाची आहेत याची नमुना घेवून तपासणी होते. निकृष्ट आढळल्यास दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येतो.
दरम्यान, जिल्ह्यातील २८५ दुकानांची तपासणी पूर्ण झाली असून गुहागर येथील शृगांरतळी व रत्नागिरी येथील जाकादेवी या दोन दुकानदारांनी खते विक्री करण्याचे बंद केले असून परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या दोन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
मागीलवर्षी ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
कृषी विभागाच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी रासायनिक खतांची विक्री पॉईंट ऑफ सेल पॉस मशीनद्वारे न करणे तसेच खत नियंत्रणातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिपळूण येथील ५ आणि रत्नागिरी येथील १ असे ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. तसेच ५ विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त ताकद दिली होती.