खेड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला पहिल्या दोन तासांत अनेक यंत्र बिघडल्याने अडथळे येताना दिसले. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या असून, यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी मतदान यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मतदानाचे कर्तव्य बजावल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना निवडणूक यंत्रणेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदान यंत्रणा नीटपणे हाताळता येत नसेल, तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. मतदान यंत्रांबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका असून, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्यास या शंका दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मतदान यंत्रांतील बिघाडाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहील याची जबाबदारी निवडणूक यंत्रणेने घ्यावी, असे आव्हानही रामदास कदम यांनी यावेळी दिले आहे.