राजापूर : तालुक्यातील डोंगरगाव येथे १७०९ सालातील (शिवराज्याभिषेक शके ३५) अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक राजाज्ञापत्र सापडले आहे. या आज्ञापत्रात छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र क्षत्रियकुलावतंस छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारातून दाभोळ प्रांतातील देशाधिकारी व लेखक यांना आदेश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा, वतन व्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभाराचा जिवंत पुरावा म्हणून या आज्ञापत्राकडे पाहिले जात आहे.
इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना मत्स्य आणि पर्यटनमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहायक दीपक शेलार यांच्या माध्यमातून ही जुनी कागदपत्रे प्राप्त झाली. शेलार यांच्या घरात जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीतून सुमारे १० ते १२ जुनी मोडी लिपीतील पत्रे सापडली. अत्यंत नाजूक अवस्थेतील या कागदपत्रांपैकी एक उघडल्यावर १७०९ मधील राजाज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले. कान्होजी नाईक (बिन नरसोबा नाईक) यांना सरदेशमुखी वतनाचा हक्क बहाल करताना गणोजी नाईक यांनी बळजबरीने ताब्यात घेतलेला कारभार सोडवून न्याय्य वाटप करण्याचा निर्णय या आज्ञापत्रात देण्यात आला आहे. या दस्तावेजातून
मराठा काळातील वतन व्यवस्थेतील स्पष्ट नियम, दायादपणाचा विचार, स्थानिक वादांचे न्यायनिवाडे कागदोपत्री पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. वतनाचा कारभार वंशपरंपरेने चालवण्याचा अधिकार, तसेच महसूल, इनाम व शेरणी यांसारख्या बाबींचा उल्लेखही या आज्ञापत्रात आहे.
कोकणच्या इतिहासातील अज्ञात पैलू उलगडणार
इतिहास अभ्यासकांच्या मते, छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कोकण प्रदेश राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. दाभोळ, राजापूर यांसारख्या बंदरांमुळे व्यापार फुलला होता, तर सिद्दी, आंग्रे आणि मराठे यांच्यातील सत्ता संतुलनामुळे प्रशासन अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत स्थानिक वतन व महसूल व्यवस्थेवर विशेष भर दिला जात होता. परिस्थितीत स्थानिक वतन व महसूल व्यवस्थेवर विशेष भर दिला जात होता.