राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या नव्या सभागृहाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला मुख्याधिकारीच गैरहजर असल्याने नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून ठोस उत्तरे देता आली नाही. त्यातच अनधिकृत बांधकाम, नगर परिषद गाळ्यांची थकीत करवसुली यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे पहायला मिळाले.
लोकनियुक्त नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर नगर परिषदेची पहिली सभा झाली. मुख्याधिकऱ्यांच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षा खलिफे यांनी आपल्या अनुभवानुसार ही सभा कौशल्याने हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महत्वाच्या विषयांबाबत प्रशासनाकडून निश्चित माहिती तत्काळ देण्यास असमर्थतता दर्शवण्यात आल्याने त्याबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्तकरण्यात आली. या सभेच्या विषय पत्रिकेवर तब्बल 33 विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी बरेचसे विषय प्रशासकीय पातळीवरील कामकाजाच्या मंजुरीचे होते. त्यातील अन्य काही विषयांवर सभागृहात नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेत आपली मते मांडली. सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, बांधकाम सभापती सुबोध पवार, नगर परिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती सौरभ खडपे, सत्ताधारी तसेच विरोधी गटनेते ॲड. जमीर खलिफे, ॲड. राहुल तांबे, सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर, महेश शिवलकर, दिलीप चव्हाण आदींचा समावेश होता.
राजापूर शहरात अनधिकृत 72 बांधकामांच्या करवसूलीबाबत पहिल्याच सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. तसेच शहरात असलेल्या 2 हजार 664 नळ कनेक्शनच्या व्यतिरिक्त नवी कनेक्शन देण्याबाबतही चर्चा झाली. नगर परिषदेच्या मालकीच्या थकीत गाळ्यांच्या करवसुलीबाबत प्रशासनाकडे नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचे या सभेत दिसून आले. त्यावर बांधकाम सभापती सुबोध पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याबद्दल प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले. प्रशासनाने विषय पत्रिकेवर ठेवलेल्या अशा विषयांबाबत ठोस माहिती सभेत न दिल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या सभेला विरोधी गटातील नगरसेविका साजिया काझी-गिरकर वगळता इतर दोन्ही गटांतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.