रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आता पावसाचा जोर कमी होत असून चोवीस तासात केवळ २१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी मंडणगड, खेड, चिपळूण, दापोली, लांजा तालुक्यात पावसाचा जोर असून खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदी, धरणातील पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यात काही तास उन्ह, नंतर पावसाचा खेळ सुरू आहे. एकंदरीत जिल्ह्यात पूर्वीपेक्षा पावसाचा जोर ओसरला आहे.
जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १ हजार ६३३ तर एकूण १४ हजार ६९८ मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे भात लावणी ४२ हजार हेक्टरहून अधिक झाली आहे. भात लावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. दुसरीकडे नाचणीची पेरणी झाली आहे. मात्र आता जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असून तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आलाय.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होत चालला आहे. मात्र काही 3 तालुक्यांत पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. हवामान खात्यानुसार काही दिवस कोकण किनारपट्टीवर पाऊस कमी पडेल, असा अंदाज दिला, मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.