रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेला असून काही तालुक्यात भात कापणी, तर काहीठिकाणी झोडणी, मळणी अंतिम टप्प्यावर आली आहे. गुहागरसह इतर तालुक्यात रब्बी हंगामसाठी नांगरणी झाली असून पेरणीस सुरूवात झाली आहे. यंदा 6 हजार हेक्टरवर रब्बी पीक पेरणीचे उद्दिष्ट आहे. पुढील आठवड्यापासून रब्बी पेरणीला वेग येणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा चार महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. भात पिकेही मोठ्या जोमात आली होती. मात्र सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, ऑक्टोबरमध्ये परतीच्या व अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास शेतकर्यांचा गेला आहे. काही शेतकर्यांनी कापणीकरून भात पिके व्यवस्थित झाकून ठेवल्यामुळे पिके वाचली आहेत, तर काहींचे पीक पाण्यात भिजलेल आहे. दरम्यान, खरीप हंगाम वाया गेला असून आता शेतकर्यांकडून रब्बी हंगामसाठी हालचालीस सुरूवात झाली आहे. यंदा 6 हजारहून अधिक हेक्टरक्षेत्रावर पेरण्याचे उद्दिष्ट आहे. दोन तालुक्यात पेरण्यास सुरूवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेला आहे. पुढील आठवड्यात पेरणीला वेग येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 6 हजार हेक्टरक्षेत्रावर रब्बी हंगामची पेरणी होणार आहे. गुहागर, दापोली तालुक्यात पेरण्यास सुरूवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी भात कापणी, झोडणी, मळणी अंतिम टप्प्यावर आली आहे. पुढील आठवड्यात रब्बी पेरणीला वेग येईल.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी