खेड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप महाराजा प्रतिष्ठानचे सचिव तथा दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केला आहे.
रसाळगड हा ऐतिहासिक वारसा लाभलेला महत्त्वाचा किल्ला असून, त्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निखळत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा मापुस्कर यांनी केला आहे.
किल्ल्याच्या ऐतिहासिक बांधकामाच्या संवर्धनासाठी चुना, गूळ, उडीद डाळ आणि पाणी यांसारख्या पारंपरिक साहित्याचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्ष कामात या साहित्याचा योग्य वापर आणि बांधकामाची अपेक्षित गुणवत्ता दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काहीठिकाणी केवळ मातीचा भराव टाकून काम उरकले जात असल्याचेही मापुस्कर यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम करताना दर्जेदार साहित्य, पारंपरिक बांधकाम तंत्र आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा वापर होणे आवश्यक आहे, अन्यथा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही संवर्धनाचे काम टिकाऊ ठरणार नाही, अशी चिंता दुर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
रसाळगडाच्या संवर्धनासाठी खर्च करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा खरोखरंच योग्यप्रकारे वापर होत आहे का, गडाच्या बांधकामाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याची पुरातत्त्व विभागाने तातडीने पाहणी करून योग्यप्रकारे तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कामाच्या दर्जाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची संबंधित विभागाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पुरातत्व विभाग याबाबत काय स्पष्टीकरण देतो आणि कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणती कार्यवाही करतो, याकडे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.