रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२ हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति दोन हजारप्रमाणे ३१ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
देशातील लहान व सीमान्त शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारतर्फे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रति २ हजार रुपये जमा करण्यात येतात. पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत करण्यात येते. तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते. २२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे. बँक खात्याशी आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
"पीएम किसानचा २२ हप्ता जमा झालेला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी."- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी