रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पालघर येथील संतोष शशिकांत भानुशाली (50, रा. नाईक कॉम्प्लेक्स, ता. वाडा, जि. पालघर) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला; तर योग राजेश भानूशाली (22, रा. विरार, मुंबई) याला वाचवण्यात यश आले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सकाळी 10च्या सुमारास घडली.
भानुशाली कुटुंब पर्यटनासाठी रत्नागिरीत आले होते. सकाळी 9.30 वाजता ते आरे-वारे समुद्रकिनारी गेले. संतोष, मानव, वरद आणि योग हे समुद्रात पोहण्यासाठी गेले असता मोठ्या लाटेमुळे ते अडचणीत आले. यापैकी मानव आणि वरद कसेबसे पाण्याबाहेर आले.
मात्र संतोष व योग गटांगळ्या खाऊ लागले. कुटुंबीयांच्या आरडाओरडीनंतर रेस्क्यू टीमने समुद्रात उड्या मारून दोघांना बाहेर काढले. योग शुद्धीवर होता. बेशुद्ध संतोष यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.