रत्नागिरी : राज्य सरकारने सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत या एकत्रित योजनांतर्गत 5 लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च होणाऱ्या जटिल अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा खर्च सरकार स्वता उचलणार आहे. त्यामुळे एकत्रित योजनांतर्गत रूग्णांना लाभ मिळणार असून आता अनेक जटील शस्त्रक्रियाही मोफत होणार आहेत.
नव्या धोरणानुसार आतापर्यंत ठराविक मर्यादित उपलब्ध असलेल्या उपचारांच्या खर्चाची मर्यादा ओलांडल्यास उर्वरित खर्च राज्य सरकारच्या राखीव निधीतून भागविण्यात येणार आहे. विशेषता दुर्मिळ आजार व अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असल्याने अनेक रूग्ण उपचारापासून वंचित राहत होते. आता या निर्णयामुळे त्यांना जीवनदान मिळण्याची शक्यता वाढली आहे. या योजनेंतर्गत अर्जाच्या छाननीसाठी विशेष समितीची दर शुक्रवारी बैठक घेवून तातडीने निर्णय घेण्याबाबतही शासनाचे आदेश आहे. त्याअनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे.
यकृत प्रत्यारोपण-22 लाख, फुप्फुस किंवा ह्दय 20 ालखापर्यंत, ह्रद्रय प्रत्यारोपण 15 लाख रूपये, बोन मॅरो ट्रान्सप्लांट 9.5 ते 17 लाख रूपये, ह्रद्रय व्हॉल्व्ह 10 लाख रूपयापर्यंत. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रूग्णांना महागड्या खासगी उपचारांसाठी कर्ज काढण्याची किंवा मालमत्ता विकण्याची गरज भासणार नाही.गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना आधुनिक आणि खर्चिक उपचार शासकीय व अंगीकृत खासगी रूग्णालयात विनामूल्य मिळतील असेही योजनेच्या परिपत्रकात नमूद आहे.
उपचारांच्या यादीत वाढ करून आता एकूण 2 हजार 399 उपचारांना मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वी उपचारांची मर्यादा 5 लाख रूपयापर्यंत होती. पंरतु आता 9 प्रकारच्या दुर्मिळ व खर्चिक शस्त्रक्रियांसाठी ही मर्यादा शिथिल केली आहे. उपचाराचा खर्च 5 ते 22 लाख रूपयांपर्यंत असला तरी तो शासन कॉर्पस फंडद्वारे राखीव निधी देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रे बंधनकारक
आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, आयुष्यमान कार्ड किंवा वैध रेशनकार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा, संमतीपत्र रूग्ण किंवा नातेवाईकांचे स्वयं घोषणापत्र आदी.