रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यान विभागाचे कामगार काशिनाथ लक्ष्मण गोताड (वय ५१) झाडाझुडुपांची छाटनी करत असताना विषारी घोणस सापाचा दंश होवून त्यांचा मृत्यू झाला. शहरातील गोगटे कॉलेजच्या मैदानावरील तोडलेल्या झाडांच्या फांद्या उचलत असताना गुरूवारी दुपारी हा सर्पदंश झाला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
गोगटे कॉलेजच्या मैदानावर रविवारी शासकीय कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मैदानावरील झाडेझुडूपे तोडण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य व ड उद्यान विभागाचे कामगार काम करत होते. गुरूवारी दुपारी तोडलेल्या झाडांच्या फांद्या उचलत असताना सर्पदंश झाला.
सहकारी कामगाराला सर्पदंश झाल्याचे कळताच त्याला जिल्हा रुग्णालयात लगेचच दाखल करण्यात आले. गुरूवारी गोताड यांची तब्येत रात्रीपर्यंत स्थिर होती. त्यांना उपचारासाठी इतरत्र हलवण्याचा विचार स्थगित करण्यात आला. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मंत्रयांच्या रविवारी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त तयारीचा भाग म्हणून परिसराची स्वच्छता करण्याचे काम गोताड व त्यांचे सहकारी करीत होते.
अवघ्या २० दिवसांपूर्वीच ते रत्नागिरी नगर पालिकेच्या उद्यान विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणन रुजू झाले होते. गुरुवारी दुपारी ते महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ झाडे तोडत असताना त्यांना घोणस सापाने दंश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून ते खालचा फगरवठार या भागात राहतात.
या घटनेमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेचे पितळ उघडे पडले आहे. नियमांनुसार कोणताही कंत्राटी कामगाराला सुरक्षेसाठी रबरी बुटांपासून हात मोज्यांपर्यंत आवश्यक ती सर्व सुरक्षा उपकरणे पुरवणे ही कंत्राटदाराची कायदेशीर जबाबदारी असते. मात्र ठेकेदाराने कोणतेही सुरक्षेची साधने पुरवली नसल्याचे पुढे आले आहे.
मंत्री सामंत मदत करणार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनासह नगर पालिका प्रशासनाला काशिनाथ गोताड यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा सूचना केल्या आहेत. आपण स्वतः ही गोताड कुटुंबीयांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.