accident file photo
रत्नागिरी

Mumbai-Goa Highway Accident| मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा; 24 तासांत दोन भीषण अपघात

अपघातांत एका महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा भीषण अपघातांनी हादरला असून अवघ्या चोवीस तासांत कशेडी बोगदा ते भरणे नाका परिसरात दोन मोठे अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी १५ मे रोजी मध्यरात्री १२.२६ वाजण्याच्या सुमारास कळंबणी येथील कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ घडला. गणपतीपुळे येथून नाशिक-सिन्नरकडे जाणाऱ्या सीएनजी सिलेंडर वाहक कंटेनरला झायलो कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील काही प्रवासी जखमी झाले. तसेच अपघातानंतर सीएनजी कंटेनर चालकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली असून तोही जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिज धाम यांच्या २४ तास सेवेत असलेल्या विनामूल्य रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. जखमी शैलेश जयसिंग गुरव (वय ३६, अरवली) व पूजा सुमित गांगुर्डे (वय २३, सिन्नर-नाशिक) यांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य केले.

दरम्यान, याच महामार्गावर १४ मे रोजी पहाटे ५.४० वाजता नातूनगर येथे आणखी एक गंभीर अपघात झाला होता. झायलो चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरला कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नादिया इमरान जसनाईक (वय २७) यांचा मृत्यू झाला. तर अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४), सबिया मारूख जसनाईक (वय ३३), सेहरा मारूख जसनाईक (वय ७) आणि इमरान मुरात जसनाईक (वय ४५) हे जखमी झाले.

या घटनेनंतर जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिज धाम यांच्या विनामूल्य रुग्णवाहिकेसह जय हिंद ॲम्बुलन्स खेड, १०८ रुग्णवाहिका सेवा व स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. सर्व जखमींना यश हॉस्पिटल, भरणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेल्या आठवडाभरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लहान-मोठ्या शेकडो अपघातांची नोंद झाली आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे, वेगमर्यादेचे उल्लंघन, रात्रीच्या वेळेतील निष्काळजी वाहनचालक आणि अवजड वाहनांची वाढती वर्दळ ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT