रत्नागिरी : दोन वर्षांच्या बालकाचे मुंबई येथील हॉस्पिटलमधून अपहरण करुन रेल्वेतून नेणार्या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेमधील टीसी संदेश चव्हाण यांच्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 27 सप्टेंबर रोजी ही अपहरणाची घटना उघडकीस आली.
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या दादर ते सावंतवाडी या रेल्वेमध्ये टीसी संदेश चव्हाण यांना एका प्रवाशाकडे लहान मुल आढळले. त्याचे त्या मुलासोबतचे वागणे टीसी चव्हाण आणि अन्य प्रवाशांना संशयास्पद वाटले. त्यामुळे चव्हाण यांनी संशयीताची चौकशी केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे यांनी त्या प्रवाशाला धरून ठेवले आणि तात्काळ नियंत्रण कक्ष वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलिस ठाणे यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ताजने यांनी संशयित प्रवासी अमोल अनंत उदलकर (42, रा. इंदील देवगड) याला मुलासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करताच त्याने तेे बालक मुंबई केइम रुग्णालयातून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले.
बाळाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीकडे असलेल्या या मुलाचे अमोलने अपहरण केले होते. यानंतर संशयिताला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कोकण रेल्वे टीसी संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश आल्याने चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वेमध्ये आपली सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तात्काळ घेत संदेशचे विशेष कौतुक करत त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. संदेश चव्हाण यांना कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्याहस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले आहे.