MSRTC bus fare hike Pudhari
रत्नागिरी

ST Bus Fare Hike : बुधवारपासून एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

मुंबई, पुणे,तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर, धाराशिवसह इतर लांब पल्ल्याचा प्रवास होणार महाग

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्यावतीने येत्या 15 एप्रिल 2026 पासून 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सुट्टीमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. यंदा पर्यटनाबरोबरच मामाच्या गावाचा प्रवास महाग पडणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतून मुंबईचे तिकीट 62 रुपयांनी, बोरिवली 65 रुपये, पुणे प्रवास 57 रुपये, लांजा-अक्कलकोट सुमारे 50, लांजा-धाराशिव 55 ते 60 रुपयांनी महागला आहे. मात्र निमआराम, शयनयान आसनी व शिवशाहीचे दर केवळ दोन रुपयांनी वाढवले आहेत.

विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर कित्येकजण पर्यटनाबरोबरच मामाच्या गावाला जाण्याचा प्लॅन करतात. उन्हाळ्यात एसटी बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे उत्पन्न वाढावे तसेच आखातातील युद्धाचा परिणाम डिझेल पुरवठ्यावर झाला आहे म्हणून एसटी महामंडळाच्यावतीने 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाचा फटका बसणार आहे. लांजा-मुंबई 65, लांजा-पुणे 60, गुहागर मुंबई 54, गुहागर-पुणे 54, दापोली-मुंबई 41, दापोली-पुणे 36, संगमेश्वर-मुंबई 54, पुणे 49 रुपयांनी तिकिटाचे दर वाढले आहे. या तिकीट दरवाढीला विविध पक्षांकडून विरोध होत आहे.

स्वच्छतेसाठी 15 एप्रिलपासून 2 रुपये अधिक द्यावे लागणार

एसटी बस आणि बसस्थानकाच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार वसूल करण्याचा निर्णय घेतला असून 15 एप्रिलपासून प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाला दोन रुपये जादा मोजावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT