रत्नागिरी : एस. टी. बस आणि बसस्थानकाच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 15 एप्रिलपासून प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाला दोन रुपये जादा मोजावे लागणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त हेोत असून या निर्णयाचा एसटी महामंडळाने फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यासह राज्यभरातील एसटी बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. बसेस दुरुस्ती नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी 14.99 टक्के भाडेवाढ केली आहे. त्यानंतर आता एसटीने स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी हा निधी उभारण्याचे ठरवले आहे. मात्र, या स्वच्छतेचा फटका प्रवाशांना बसणार असून प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे 2 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील प्रवाशांकडूनही हे शुल्क घेतले जाणार आहे. दरम्यान, सर्व आगारांमध्ये ईटीआय मशिनद्वारे ही वसुली करण्यासाठी तांत्रिक बदल करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना दिलासा
महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांना या अधिभारातून पूर्णपणे वगळले आहे. विद्यार्थ्यांचे मासिक पास, अहिल्याबाई होळकर योजना, मानवी विकास आणि सुट्टीच्या कालावधीत घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणताही अतिरिक्त अधिभार घेतला जाणार नाही.
15 एप्रिलपासून अंमलबजावणी
ही नवीन भाडे आकारणी 14 एप्रील आणि 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. ज्या प्रवाशांनी 15 एप्रीलपूर्वी आगाऊ आरक्षण केले आहे. त्यांच्याकडून मात्र हा फरक वसूल केला जाणार नाही.
एसटी महामंडळाने फेरविचार करावा
एसटी बसची स्वच्छता हे महामंडळाचे काम, कर्तव्य आहे. त्याचा खर्चही त्यांनी करणे गरजेचे आहे. यापूर्वीच भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यानंतर आता प्रत्येक प्रवाशाकडून 2 रुपये स्वच्छता अभिभार वसूल करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. याचा फेरविचार एसटी महामंडळाने करावा, अशी मागणी एक प्रवासी राहुल पाटील यांनी केली.