रत्नागिरी : कोकणाची शान असलेला काजूला आता जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरी सह कोकणातील काजू लागवड क्षेत्र वाढवून या ठिकाणी व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या धरतीवर अत्याधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यामुळे कोकणातील काज्यू मूल्यवर्धन साखळीला मोठी उभारी मिळणार आहे. राज्यात काजूची उत्पादन क्षमता मोठी असूनही प्रक्रिया उद्योगांसाठी परदेशातून काजू बी आयात करावी लागते ही परिस्थिती बदलण्यासाठी आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांना लागवडीसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. काजू उत्पादक पट्ट्यात साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या बैठकीला पणन महासंघाचे कार्यकारी संचालक राहुल कुलकर्णी काजू परिषदेचे सीईओ संजय कदम तज्ञ संचालक रुपेश बेलोसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साठवणुकी अभावी स्थानिक शेतकऱ्यांना काजू बी कमी दरात विकावी लागते ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यात 500 ते 5000 मॅट्रिक टन क्षमतेची अवाढव्य गोदामे उभारली जाणार आहेत.
यामुळे सुमारे सव्वा लाख टन काजू बी साठवणुकीची क्षमता वाढेल. विशेष म्हणजे या प्रक्रियेत महिला बचत गट आणि सेवा संस्थांचा सहभाग वाढवून त्यांना सोलर युनिट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकल्पांना शासन स्तरावर मोठे अनुदान देण्याची भूमिका ही परिषदेने घेतली आहे. काजू उत्पादनाचे निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर मध्येही 200 मॅट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित असून संपूर्ण कोकण किनारपट्टी काजू प्रक्रियेचे हब म्हणून विकसित करण्याचा संघ या बैठकीत बांधण्यात आला आहे.