Uday Samant 
रत्नागिरी

Uday Samant : ऑनलाईन बैठकांनी पक्ष वाचत नाही; जमिनीवर उतरा

शिंदे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पक्षातील खासदार, आमदार आणि कार्यकर्ते का दूर गेले, जनतेशी तुटलेली नाळ कशी जोडायची, याचा विचार उद्धव ठाकरे गटाने करावा. ऑनलाईन बैठका घेऊन पक्ष वाढत नाही. त्यासाठी जनतेत उतरून काम करावे लागते. पक्ष कसा वाढवायचा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकावे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्‍य ठाकरे यांना लगावला आहे. तसेच दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची अवस्था काय झाली आहे, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर उबाठाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उद्योगमंत्री सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रत्‍नागिरी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सामंत यांनी, काँग्रेससोबतच्या युतीवरूनही उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करून काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी आम्हाला ठाकरे विचार शिकवू नयेत. आधी बाळासाहेबांची भाषणे ऐकावीत, असे ना. सामंत म्हणाले. तसेच राहुल गांधींसोबतच्या मैत्रीवरूनही त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली.

संजय राऊत यांच्यासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, संजय राऊत आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांना फोन करून विचारपूस केली होती. मात्र, आज शिंदे आजारी असताना विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली टीका पाहता राजकारण कोणत्या थराला गेले आहे, हे जनतेने पाहिले आहे. विरोधकांच्या आंदोलनावर टीका करत त्यांनी, हे तुडवा आंदोलन नसून केवळ हुल्लडबाजीचे आंदोलन असून आम्ही नेहमी बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार त्‍यांनी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT