रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची 'राष्ट्राय स्वाहा' ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. शासन स्तरावर सावरकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय, खल्वायन निर्मित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘संगीत नृत्य नाट्यमय कार्यक्रम विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतीची धगधगती ज्वाला’ कार्यक्रम रत्नागिरी शहरात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री शेलार बोलत होते.
सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला उजाळा देताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले, ‘सावरकर एक उत्तम लेखक, कवी, नाटककार आणि मराठी-हिंदी साहित्याला समृद्ध करणारे शब्दशूर होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगतानाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. सावरकरांच्या स्मृतीला वंदन करत, त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजच्या तसेच येणाऱ्या पिढीने पुढे न्यावा. लोककलांच्या आयोजनासाठी आणि त्यांच्या वृद्धीसाठी शासनातर्फे तब्बल १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.’
महाराष्ट्राची ही 'सॉफ्ट पॉवर' (संस्कृती) जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी शासन सातत्याने पावले उचलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिल्यानंतर, महाराष्ट्राची कला आणि संस्कृती घराघरांत पोहोचवण्याचा विडा उचलला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ‘आम्ही केवळ ३०० किंवा ४०० कार्यक्रम करत नाही, तर वर्षभरातील ३६५ दिवसांत संपूर्ण राज्यभरात १,२०० सांस्कृतिक कार्यक्रम करतो’, असे ते म्हणाले.
शिरगाव येथील मोरेश्वर दामले यांच्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले होते. त्यावर त्यांचे नातू रवींद्र दामले यांनी लिहिलेले पुस्तक सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांना देण्यात आले. यावेळी आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रशांत यादव, कार्यक्रमाचे लेखक श्रीकृष्ण जोशी, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, अभिनेते सुशांत शेलार आदी उपस्थित होते.