महामार्गाचे काम एप्रिलपर्यंत झाले पाहिजे : खासदार नारायण राणे  pudhari photo
रत्नागिरी

महामार्गाचे काम एप्रिलपर्यंत झाले पाहिजे : खासदार नारायण राणे

हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग प्रश्री कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका, सर्वसामान्यांशी निगडित हा प्रश्न आहे आणि अनेक वर्ष प्रलंबित आहे, त्यामुळे युद्ध पातळीवरील हे काम हातात घेऊन दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेऊन मला माहिती द्या, येत्या एप्रिलपर्यंत महामार्गाचे काम झाले पाहिजेत, अशा सूचना माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग अधिकाऱ्यांना केल्या. आपण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असून आवश्यकता वाटल्यास त्यांचा दौऱ्याचे आयोजन करु, असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे रत्नागिरीत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खात्यातील अधिकाऱ्यांशी बैठक लावली होती. या बैठकीला आ. किरण सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्ग आणि मिऱ्या नागपूर महामार्गाचा आढावा यावेळी खा. राणे यांनी प्राधान्याने घेतला. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे व्यापारी व्यावसायिक पर्यटक सामान्य वाहन चालक या सगळ्यांनाच त्रास होतो आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रश्नांना आम्ही काय उत्तरे द्यायची. अधिकारी म्हणून कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका. जो दिरंगाई करतो, त्याच्यावर कारवाई करा नाहीतर नितीन गडकरी यांना बोलावून त्याच्यावर जागेवर कारवाई करायला सांगावे लागेल असेही ते म्हणाले. येत्या एप्रिल पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी १५ दिवसांनी आढावा बैठक घ्या, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना केल्या. महामार्गात येणारे पूल किंवा रस्त्यांबाबत नागरिकांचे प्रश्न आहेत. त्याबाबत आपण अधिकाऱ्यांना तज्ज्ञांचे अहवाल घेण्यास सांगितले आहेत.

ते अहवाल आल्यानंतरच आपण त्यावर संबंधित ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणतेही काम, व्यवसाय यांना हरकती घेणे, ते बंद पाडणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. ते घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रसंगी कठोर कारवाईची भूमिका घेतली पाहिजे. विकासाच्या आड कोणीही येत असो, कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक असोत, त्यांना योग्य प्रकारे समजावून सांगा, त्यांना पटले नाही तर कारवाईचा बडगा उगारून, जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी एक ठोस भूमिका बजावली पाहिजे अशा सूचना यावेळी राणे यांनी दिल्या, पुढील दर महिन्याने याबाबतचा आढावा आपण घेणार असल्याचे खा. राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT