रत्नागिरी/पुणे : अल निनोचे अडथळे पार करत अखेर सोमवारी सकाळी मान्सून रत्नागिरी, कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, पुणे शहरात दाखल झाला. यंदा तो नियोजित तारखेपेक्षा तब्बल १५ दिवस उशिरा आला. मान्सूनचा वेग पाहता आगामी ४८ तासांत तो मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागील पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. अखेर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस परतला आहे. रविवारी काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर, दापोली, खेड, मंडणगड तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्याचबरोबरच राजापूर तालुक्यात पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. दोन दिवसांत तब्बल ७३ मि.मी. इतका पाऊस झाला आहे, तर सोमवारी जिल्ह्यात ७१.३ मि.मी. इतका पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना व पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी लांजा तालुक्यात रात्री आणि सकाळच्या सत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. राजापूर तालुक्यात तुरळक पाऊस झाला, तर दुपारी तीनच्या सुमारास रत्नागिरी शहरात व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील विविध सखल भागात पाणीच पाणी साचले होते. मंडणगड तालुक्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला २२ ते २६ जूनपर्यंत पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.