रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील दिल्लीच्या दिशेने धावणार्या राजधानी एक्स्प्रेसह 11 गाड्यांचा खोळंबा झाला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळ 5.30च्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम ही मंगला एक्स्प्रेस (12618) रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली येथे आली असता गाडीचा पॅन्टोग्राफ रेल्वे गाड्यांना वीजपुरवठा करणार्या ओव्हरहेड वायरला (ओएचई) आधार देणार्या तारेमध्ये अडकून ती तुटल्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड निर्माण झाला. यामुळे त्रिवेंद्रम ते दिल्ली दरम्यान धावणार्या राजधानी एक्स्प्रेससह 11 गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओव्हहेड वायरमधील बिघाड दूर केल्यानंतर साडेतीन तास खोळंबा झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. बिघाड दूर केल्यानंतर घटनास्थळाहून पहिल्यांदा राजधानी एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात आली. त्या पाठोपाठ विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या गाड्या रवाना झाल्या.