खेड : पुढारी वृत्तसेवा
तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. २००६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील हे आरोपी गेली दोन दशके बनावट नावाने राहत होते.
अखेर गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे त्यांना जेरबंद करण्यात आले. खेड पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील फिर्यादी फातिमा इसाक सुर्वे (रा. सवनस, ता. खेड, जि. रत्नागिरी) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुहूर अब्दुल रज्जाक सुर्वे व गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे (दोघेही रा. सवणस, ता. खेड) यांनी २००५ मध्ये मयत आबिदा मियांसो सुर्वे (७५) यांच्या घरातून १० हजार रुपये चोरी केले होते.
त्यापैकी ५ हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रकमेच्या मागणीवरून वाद वाढल्याने आरोपींनी आबिदा सुर्वे यांचा खून करून पुरावा नष्ट केला व तेथून फरार झाले होते. दरम्यान, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी नावे व पत्ते बदलले होते. ते अनुक्रमे राजू गजानन तांबे व संदीप गजानन तांबे या नावाने मोहो, चिखले (ता. पनवेल, जि. रायगड) येथे राहत होते.
खेडचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने, जुने अभिलेख व गोपनीय माहितीच्या आधारे ७ मार्च रोजी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोन्ही आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, अजय कडू, विजेंद्र सातार्डेकर, वैभव ओहोळ, शिरीष साळुंखे, कृष्णा दराडे, एएसआय साळवी, विकास पवार व सूरज मोरे यांनी सहभाग घेतला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बागाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी व उपविभागीय पोलिस अधिकारी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आरोर्पीना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.