रत्नागिरी

ईअर टॅगिंगची आजपासून अंमलबजावणी; पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जनावरांना ईअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 1) पासून सुरू होणार आहे. ईअर टॅगिंग, तसेच भारत पशुधन प्रणालीवर नोंद या गोष्टींमुळे जनावरांची खरेदी-विक्री, तसेच सर्वच प्रकरणातील शासकीय मदत, वाहतूक, बैलगाडा शर्यतीतील बैलांचा सहभाग यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांना ईअर टॅगिंग करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय एक जून 2024 नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. दि. 31 मार्चपर्यंत टॅगिंग बंधनकारक करण्यात आले होते. त्याची मुदत वाढवून दि.31 मेपर्यंत करण्यात आली. विशेष म्हणजे टॅगिंग असल्याशिवाय सरकारच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून मिळणाच्या सेवाही बंद केल्या जाणार आहेत. पशुधनातील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता, तसेच प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने या बाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ईअर टॅगिंगच्या निर्णयामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार व जनावरांच्या मालकांवर कारवाई होणार आहे. जनावरांची विक्री करता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना टॅगिंग असल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही. जनावरांच्या टॅगिंगशिवाय कोणत्याही प्रकारचे दाखले संबंधित शेतकर्‍याला मिळणार नाहीत.
भविष्यामध्ये येणार्‍या पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीही नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय उपचार केले जाणार नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात पशुधन योजनांचा लाभ मिळणार नाही. जिल्हा परिषदचे पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी ईअर टॅगिंग करण्याचे काम करत आहेत. शेतकर्‍यांनी जनावरांचे ईअर टॅगिंग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT