दापोली : प्रवीण शिंदे
पहाटेच्या अंधुक प्रकाशात समुद्राकडे सरकणाऱ्या नौका, किनाऱ्यावर मासळीच्या प्रतीक्षेत असलेली लगबग आणि बंदरात सुरू झालेली खरेदी-विक्रीची धावपळ... हर्णे बंदराने पुन्हा एकदा मासेमारीच्या हंगामाची चाहूल घेतली आहे. नारळी पौर्णिमेनंतर समुद्रात मच्छीमारांची वर्दळ वाढली आहे. १५ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू झालेल्या मासेमारी हंगामामुळे बंदरातील व्यवहारांना वेग आला आहे.
आतापर्यंत सुमारे २५० नौका मासळीच्या शोधात समुद्रात उतरल्या असून पहिल्याच आवकेत कोळंबी आणि बांगड्याची चांगली आवक २५० नौका मासेमारीसाठी समुद्रात झाल्याने मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोठ्या नौकांसह १५ ते २० फायबरच्या छोट्या बोटीही समुद्रात उतरल्या. काही नौका पहाटे, तर काही संध्याकाळच्या सुमारास मासळीच्या शोधात समुद्राकडे रवाना होत आहेत.
पहिल्याच आवकेत कोळंबी, बांगडा
समुद्रातून परतलेल्या काही नौकांमधील मासळीचा बंदरात लिलाव करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारची कोळंबी तसेच बांगड्याची आवक झाली. सुरुवातीच्या टप्प्यात कोळंबीचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, समुद्रातील वेगवान वाऱ्यांचा परिणाम काही नौकांच्या मासेमारीवर झाला.