गुहागर शहर : गुहागर शहरातील वरचापाट स्मशानभूमी ते खाडीच्या मुखापर्यंत असलेल्या समुद्राच्या किनार्यावरील 20 वर्षापूर्वीची सुरु लागवड व नगरपंचायत गुहागर नगोत्थान योजनेतून 6 लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेली गणपती विसर्जन पाखाडी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे विदारक चित्र समुद्रकिनारी निर्माण झाले आहे. यामुळे वरचापाट येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर कंपनीच्या जेटीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या बॅक वॉटरवॉलमुळे समुद्राच्या लाटेचा प्रवाह बदलला असून याचा फटका हा आता गुहागरच्या समुद्रकिनारी जाणवू लागला आहे. त्यातच होणारा छुपा वाळू उपसा ही याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. गुहागर समुद्रकिनारी असेलेल्या सुरुबनाला या लाटांनी 20 वर्षापूर्वीपासूनची असलेली लागवड गिळंंकृत करून टाकली आहे. समुद्री लाटांचे पाणी आता माडांच्या बागांमध्ये शिरु लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समुद्रावर जाण्याची वाट बंद झाल्याचे विदारक चित्र आज पहायला मिळत आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर, महिला आघाडी अध्यक्षा अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, सरचिटणीस संतोष सांगळे, शहर अध्यक्षा स्मिता जांगळी, सरचिटणीस प्रांजली कचरेकर, माजी नगरसेवक उमेश भोसले, गजानन वेल्हाळ, जिल्हायुवा उपाध्यक्ष संगम मोरे, मंगेश रांगळे, ग्रामस्थ प्रशांत कचरेकर, शशिकांत नरवणकर आदी ग्रामस्थांनी या घटनेची पाहणी केली. यावेळी वरचापाट स्मशानभूमी ते खाडीच्या मुखापर्यंत तत्काळ बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्याकडे केली आहे. आपण याविषयी तत्काळ पत्रव्यवहार करुन हा बांधरा बांधण्यासाठी प्रयन्न करणार असल्याने त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले.