गुहागर शहर : आशिष कारेकर
तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवासी, परंतु मुंबई येथे सध्या वास्तव्यास असणारे सचिन विचारे यांची सुकन्या महाराष्ट्रातील ११ वर्षीय भारताची युवा गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिने मिशन इंडिया समिट १६ राज्ये, १६ शिखरे या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मोहिमेद्वारे अवघ्या ३२ दिवसांत भारतातील १६ राज्यांमधील १६ सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.
गेल्या चार वर्षांपासून ती सातत्याने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्वत मोहिमा पूर्ण करत असून, तिच्या जिद्द, चिकाटी आणि धाडसामुळे ती आज युवा पिढीसाठी प्रेरणास्थान बनली आहे. मिशन इंडिया समिट १६ राज्ये, १६ शिखरे ही ऐतिहासिक मोहीम २३ एप्रिल रोजी मुंबई येथून सुरू झाली आणि २५ मे रोजी गुजरातमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान ग्रिहिथाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा सामाजिक संदेश देशभर प्रभावीपणे पोहोचवत महिला शिक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी जनजागृती केली.
फक्त ३३ दिवसांच्या कालावधीत ग्रिहिथाने १६ भारतीय राज्यांमधून प्रवास केला. १५ विमान प्रवास केले. ९,१४१ कि.मी. हवाई प्रवास केला. ५,४८० कि.मी. रस्ते प्रवास केला. ६१८ कि.मी. रेल्वे प्रवास केला. १३० कि.मी. पायी ट्रेकिंग आणि चढाई केली. ३० पेक्षा अधिक शहरांमधून प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान भारतातील १६ राज्यांतील सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर केली. ग्रिहिथाने काळसुबाई महाराष्ट्र, सॉसोर्गोर गोवा, मुल्लायनगिरी कर्नाटक, मिसापुलिमला केरळ, डोड्डाबेट्टा तामिळनाडू, पातळ टोका तेलंगणा देओमाली, ओडिशा गौरलता छत्तीसगड, परसनाथ, झारखंड संडकफू पश्चिम बंगाल, तुमजांग शिखर आसाम, करोह शिखर हरियाणा, पंजाबमधील सर्वोच्च शिखर, गुरु शिखर राजस्थान धुपगड मध्य प्रदेश, गिरनार, गुजरात आदी शिखरे पार केली आहेत.
या मोहिमेपूर्वीही ग्रिहिथाने केदारकंठ उत्तराखंड, माउंट युनाम हिमाचल प्रदेश अशी अनेक प्रसिद्ध व आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. या कामगिरीमुळे ग्रिहिथाने आता भारतातील १८ राज्यांमध्ये पर्वतारोहण व ट्रेकिंग मोहिमा पूर्ण केल्या आहेत. एवढ्या कमी वयात हा टप्पा गाठणाऱ्या भारतातील ती सर्वात युवा महिला पर्वतारोहक ठरली आहे. 'मिशन इंडिया समिट १६ राज्ये, १६ शिखरे"" या मोहिमेला नॅशनल असोसिएशन ऑफ रियलटोर्स इंडिया यांचे प्रायोजकत्व लाभले.
'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा प्रभावी संदेश
संपूर्ण मोहिमेदरम्यान ग्रिहिथाने प्रत्येक शिखरावर 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'चा संदेश असलेले बॅनर फडकावत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि महिला सशक्तीकरणाबाबत जनजागृती केली. तिच्या या मोहिमेने देशभरातील नागरिकांना मुलींना शिक्षण, संधी आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 'सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र' हा संदेश तिने आपल्या साहसी प्रवासातून प्रभावीपणे पोहोचवला.