गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाने यंदाही मुंबईतून कोकणला गेलेल्या चाकरमान्यांच्या गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2024) अक्षरशः तीन तेरा वाजवले. 8 तासांचा हा प्रवास 15 ते 20 तासांवर जाऊन पोहोचला. परिणामी, असंख्य चाकरमान्यांना गणरायाची प्रतिष्ठापना साधता आली नाही. ‘गणपती घरात आणि चाकरमानी रस्त्यातच!’ अशी विचित्र स्थिती चाकरमान्यांची महामार्गाने करून ठेवली. अनेक ठिकाणी तर दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनालाच ही मंडळी पोहोचली.
यंदा चाकरमान्यांनी तशी 4 सप्टेंबरपासूनच गणपतीसाठी (Ganeshotsav 2024) गावाची वाट धरली होती; मात्र बहुसंख्य चाकरमानी शुक्रवारी मुंबईतून गावाकडे निघाले. परंतु, महामार्गाचे रडगाणे पुन्हा आड आले. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि शनिवारी प्रतिष्ठापनेचा मुहूर्त टळला तरी ही मंडळी पोहोचलेली नव्हती. कोकणातील चाकरमान्यांसाठी सरकारने मुंबईतून एस.टी. महामंडळाच्या 5 हजार गाड्या आणि 10-10 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या खर्या; परंतु या प्रचंड वाहनसंख्येला वाहून नेण्याची ताकद ना महामार्गात होती.
मुंबईकर चाकरमानी जेव्हा गावी यायचे नियोजन करतात तेव्हा जास्तीत जास्त बारा तासांत तळकोकणात पोहोचू, असा त्यांचा प्लॅन असतो. यावेळी मात्र लांबलेल्या प्रवासामुळे प्रतिष्ठापनेचा मुहूर्त (Ganeshotsav 2024) आला तरी काहींना घर गाठता आले नव्हते. अगदी मुहूर्तावर प्रतिष्ठापना व्हावी म्हणून काहींनी शेजार्यांकडूनच बाप्पाची प्रतिष्ठापना करून घेतली.