प्रवीण शिंदे
दापोली : दापोली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी आता वेगळीच वळणे घेतली असून, प्रचाराच्या मैदानात एक नवा आणि चर्चेचा मुद्दा पुढे आला आहे. प्रत्येक उमेदवार जिंकून येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘एक मत मला द्या, उरलेलं मत दुसऱ्या कोणालाही द्या’, अशा शब्दांत थेट मतदारांशी संवाद साधणाऱ्या उमेदवारांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपली पूर्ण ताकद पणाला लावत असताना, विशेष म्हणजे एकाच पक्षातील उमेदवारांकडूनच अशा प्रकारचा प्रचार सुरू असल्याचे चित्र दापोली तालुक्यात दिसून येत आहे. पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक विजयाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदाराला एकापेक्षा अधिक मते देण्याची संधी आहे. त्याचाच फायदा घेत काही उमेदवारांनी हा समायोजित प्रचार अवलंबल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र, या प्रकारामुळे पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजी अधिक ठळकपणे समोर येत असून, हा विषय चर्चेचा ठरत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही पद्धत अल्पकालीन फायद्याची ठरू शकते; मात्र दीर्घकाळात पक्षाची एकजूट आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, या प्रचारामुळे मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. दापोलीतील निवडणूक रणधुमाळी दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, शेवटच्या टप्प्यात कोणता प्रचार किती प्रभावी ठरेल आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.