रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस File Photo
रत्नागिरी

Ratnagiri rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस

26.24 मि.मी. पावसाची नोंद; भात, नाचणी व फळपिकांना फटका बसणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार अशा स्वरूपात पाऊस कोसळत असून, गुरुवारी एकूण सरासरी 26.24 मि.मी. पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीपासून गुहागर, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला, तर इतर काही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू होती.

मागील दीड महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात उकाड्याचे वातावरण होते. रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. मात्र, 16 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यानंतर दोन दिवस यलो अलर्ट राहिला. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावसाची झोडपाझोड सुरूच राहिली. या पावसामुळे काही भागात भात, नाचणीसह खरीप पिकांना बळ मिळाले असले, तरी काही ठिकाणी पिकांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फळबागांवरही हलका परिणाम होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील काही दिवस जिल्ह्यात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह मुसळधार परतीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार चाहूल लागली आहे. गुरुवारी दिवसभर संततधार कोसळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकर्‍यांची पिके धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT