राजापूर : बीएसएनएलच्या तांत्रिक बिघाडामुळे राजापूर शहर पोस्ट सेवा कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा दोन आठवड्यापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
अथक प्रयत्नानंतर काही महिन्यांपूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा सुरू केली. मागील काही महिन्यात तालुक्यातील नागरिकांनी त्या सेवेचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला. मुंबईसह देशभरात कुठेही प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण राजापूर पोस्ट कार्यालयातून मिळत होते. राजापूर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडून तेथून रेल्वे प्रवाशांना तिकिटे सहज उपलब्ध होत होती. मात्र गेले दोन आठवड्याहून अधिक काळ बीएसएनएल सेवेमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा ठप्प झाली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि निर्माण झालेल्या तांत्रिक बाबी तात्काळ दूर कराव्यात व ठप्प झालेली रेल्वे आरक्षण सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.