Rainfall in Maharashtra: बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाची हजेरी 
रत्नागिरी

Ratnagiri news | कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाल्याने कोकण किनारपट्टी भागात आगामी दिवसात हलक्यास सरींच्या स्वरुपात पावसाचे सातत्य राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रविवारनंतर सोमवारीही हलक्या सरींचा राबता सातत्याने सुरू होता. मंगळवारीही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनंत चतुर्दशीदिनी बाप्पाच्या निरोपाला पावसाची साथ राहणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असून आतापर्यंत १७ टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे. सोमवारी संपलेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ६.१९ मि.मीच्या सरासरीने एकूण ५५.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर होता. मात्र, दुसऱ्या आठवड्यात ओसरला होता. मात्र, गणेश चतुर्थीनंतर पावासाने हलके सातत्य रत्नागिरी जिल्ह्यात सुरू ठेवले होते.

सोमवारीही रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हलकी येजा सुरू होती. मात्र, दरम्यानच्या काळात वातावरण कोरडे झाल्याने तापमानातही वाढ झाली. मात्र, येत्या दोन दिवसात पुन्हा पाऊस सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाला अनुकूलता निर्माण होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या प्रभावाने किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. दोन दिवसात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून यामध्ये किनारी भागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने दहा दिवसांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT