देवरुख : आंबा घाटातील कळकदरा येथे गुरुवारी सकाळी दोन रानगव्यांची झुंज त्यांच्या जीवावर बेतली. या भीषण झुंजीत दोन्ही गवे खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडले. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या कडेला दोन नर गव्यांमध्ये (गवारेडे) झुंज सुरू होती. या झुंजीदरम्यान तोल जाऊन दोन्ही प्राणी कड्यावरून खाली कोसळले. या घटनेची माहिती साखरपा येथील वनउपज तपासणी नाक्यावरील वनरक्षकांनी संगमेश्वरच्या वनपालांना दिली.
मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफसह साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता सदर ठिकाणी दोन गवा रेडे मृत अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले. पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक दाभोळे यांना बोलावून त्यांच्याकडून शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदनात सदर गवारेडे यांचा मृत्यू हा झुंजीदरम्यान पडून झालेला असले बाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृत दोन गवारेडे यांचे शरीर सर्व अवयवांसहित घटना घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी आणून जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख न्हानू गावडे , वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक फुणगुस आकाश कडूकर, वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली सुरज तेली , वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा, रणजीत पाटील, महादेव जलने ,श्रीमती मिताली कुबल, प्राणी मित्र महेश धोत्रे, दिलीप गुरव हे उपस्थित होते. सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.