देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गोवरेवाडी बसथांब्याजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शामराव साळोखे (वय 66, रा. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एम.एच. 09 एल 2608) घेऊन कोल्हापूरहून गणपतीपुळेकडे निघाले होते. रिक्षामध्ये पेढ्यांचे बॉक्स भरून गणपतीपुळे येथील दुकानदारांना माल पोहोचवण्यासाठी ते जात होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गोवरेवाडी बसथांब्याजवळ या रिक्षाचा भीषण अपघात झाला.
हा अपघात इतका जोरदार होता की, रिक्षाचालक रिक्षाखाली अडकून पडला होता. अपघात नेमका कसा झाला याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला रिक्षाखालून बाहेर काढून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी साखरपा पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा अधिक तपास सुरू केला आहे.