साडवली : क्षेत्र कोणतेही असो त्यात जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न केले तर यश हे नक्कीच मिळते. संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर येथील लता राजाराम लिंगायत यांनी वयाच्या 52 व्या वर्षी 12 वीची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात त्यांनी 61 टक्के गुण मिळवले आहेत. वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी मिळवलेले यश सध्या कौतुकास पात्र ठरत आहे.
लता लिंगायत या धामापूर तर्फे देवरुख येथील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. आपल्या नोकरी व कौटुंबिक जबाबदारीतून वेळ काढत त्यांनी मोठ्या जिद्दीने व चिकाटीने 12 वीची परीक्षा दिली. लता लिंगायत तथा सौ. लता विजय देवधरकर (सासरचे नाव) यांना दहावीनंतर पुढील शिक्षणाची ओढ होती. मात्र, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शिक्षणासाठी वेळ देणे अवघड होत असतानाच वयही वाढत चालले होते. मात्र, शिक्षणाची ओढ काही कमी होत नव्हती.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात आपण 12 वीची परीक्षा द्यायची असा मनाशी ठाम निर्णय घेत वयाच्या पन्नाशीत अखेर 12 वीची परीक्षा दिली. नोकरी आणि कौटुंबिक कामातून वेळ काढत मिळेल त्यावेळेत मोठ्या जिद्दीने त्यांनी अभ्यास केला. नुकताच 12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. यात त्यांना 61 टक्के गुण मिळाले आहेत. दहावी नंतर 30-35 वर्षांनंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊन यश मिळविणे सोपे नसते. त्यात उतरते वय आणि जबाबदर्या या गोष्टी आल्या. या सर्वांचा विचार करून लता लिंगायत यांनी वयाच्या पन्नाशीत बारावीमध्ये मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे.