रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा आज, 23 नोव्हेंबर रोजी होत असून, रत्नागिरी जिल्ह्यात या परीक्षेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पेपर 1 ला 1 हजार 762 तर पेपर 2 ला 2 हजार 589 असे एकूण 4 हजार 351 उमेदवार बसणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण 4 हजार 351 उमेदवार या परीक्षेला बसणार असून, त्यांच्यासाठी एकूण 10 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांबरोबरच उमेदवाराचे थम रीडिंगही घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण यासाठी 350 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली ही परीक्षा शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.