कोकण

‘हापूस’चे दर आवाक्याबाहेर!

दिनेश चोरगे

कणकवली; अजित सावंत :  बदलत्या हवामानाचा फटका कोकणी मेव्याला बसला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, प्रचंड उष्मा व थंडी यामुळे यंदा कोकणी मेव्याचे उत्पादन घटले आहे. यामुळे अल्प उत्पादन असलेल्या हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. सध्या देवगड हापूसचा दर 700 ते 800 रु. डझन आहे. रायवळ आंबाही फारसा नसल्याने चाकरमान्यांसह स्थानिकांची निराशा झाली आहे.

देवगडच्या हापूस उत्पादनात गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने घट होत आहे. दरवर्षी हापूसचे जेमतेम 20 ते 25 टक्केच उत्पादन मिळत आहे. सध्या देवगडचा हापूस 700 ते 800 रु. डझन आहे. पुढील 15 दिवस तरी हे दर खाली येणार नाहीत, असे जाणकारांचे मत आहे. बाजारात हापूसची आवक काही प्रमाणात सुरू झाली आहे. परंतु सर्वसामान्यांना दुरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. रायवळ आंबे ही कसर भरून काढत असत. मात्र यावर्षी रायवळ आंब्यांचे प्रमाणही कमी आहे. जे आहेत ते पिकायला अजून 15 दिवस जाणार आहेत. त्यामुळे यंदा आंब्याची चव चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

काजू हंगाम अंतिम टप्प्यात आहे. काजूलाही यंदा लहरी हवामानाचा फटका बसला आणि जे उत्पादन होते, त्याला दर नसल्याने शेतकरी उत्पादक अडचणीत आले आहेत. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सह्याद्री पट्ट्यात चक्रीवादळसद़ृश वादळ झाले. त्यामध्ये आंब्याला आलेला मोहोर आणि लागलेली फळे गळून पडली. काजू पिकाचीही मोठी हानी झाली असून उत्पादन घटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT